गर्जा महाराष्ट्र २४ न्युज वृत्तसेवा
नांदगाव ता.०८: मराठा आरक्षणाच्या मुद्दयांवर नवी मुंबईतील लढाई जिंकल्यावर मनोज जरांगे-पाटील हे तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,बागलाण येथील कार्यक्रम आटोपल्यावर ते नांदगावमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी जय्यत तयारी केली आहे.मराठवाड्याच्या हद्दीवर नांदगाव तालुका असल्याने या मार्गाने ते पहिल्यांदा जाणार आहेत. नांदगाव शहरात काही क्षण ते थांबून हितगूज करणार असल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शहराबाहेरील असलेल्या महामार्गावरील चौफुलीजवळ मविप्र संचालित महाविद्यालयाजवळ त्यांचे स्वागत होणार आहे. महाविद्यालयाजवळ स्वागतासाठी छोटेखानी शामियाना उभारण्यात येणार असून, याठिकाणी ते वाटेत गंगाधरी पर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत होणार असून पुष्पवृष्टी करण्यात येईल.