महाराष्ट्र

रस्ता दुरुस्तीसाठ प्रहार चे अर्धनग्न आंदोलन

कासारी ते जळगाव फाटादरम्यान रस्त्यावर खड्डे; प्रशासनाचे दुर्लक्ष

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा

नांदगाव, ता. ४ नांदगाव ते छत्रपती संभाजीनगर या राज्य महा मार्ग २६ वर कासारी ते जळगाव फाटादरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता.२) सकाळी अकराला प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अर्धनग्न अवस्थेत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

राज्य मार्ग २६ ची मागील काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करुन डागडुजी करण्यात आली होती. तर काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु, कन्नड येथून चाळीसगाव कडे जाणाऱ्या महामार्गावर असलेल्या औट्राम घाट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेशानुसार सुमारे सहा महिन्यांपासून जड वाहतूकीसाठी बंद करून सदरची वाहतूक शिऊरु बंगला तलवाडा, कासारी मार्गे चाळीसगावच्या दिशेने वळविण्यात आली आहे. या रस्त्यावर अतिरिक्त जड वाहनांची वर्दळ वाढल्याने नांदगाव तालुक्यातील कासारी ते जळगाव फाटा दरम्यान आठ किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्याची ताबडतोब खड्डे बुजवून दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात
आले होते, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नसल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत झोडगे,जय भागवत,रवींद्र सूर्यवंशी, रविकांत भागवत,निवृत्ती सोनावणे,गणेश चव्हाण,नानाभाऊ मोरे, बुरकुल,राजू चव्हाण यांनी अर्धनग्न अवस्थेत रास्ता रोको करून आंदोलन केले.

यावेळी बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप निकम यांनी आठ दहा दिवसांत खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल असे लेखी आश्वासन देत त्वरित मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.