बांधकाम कामगारांना मिळणार वार्षिक १२ हजार पेन्शन
कुटुंबियांना मिळणार आर्थिक पाठबळ : कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची घोषणा

गर्जा महाराष्ट्र २४न्यूज वृत्तसेवा :
बाबासाहेब कदम
नांदगांव ता १४ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळातील नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना गिफ्ट मिळाले आहे.बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.आता ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर या कामगारांना निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन मिळणार आहे.याबाबतची घोषणा राज्याचे श्रम व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधिमंडळात केली आहे.या निर्णयानंतर राज्यातील सध्या मंडळाकडे नोंदणी असणाऱ्या ५८ लाख कामगारांच्या कुटुंबिय आणि यापुढे मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या कामगारांचे कुटुंबियांचं भवितव्य सुरक्षित होणार आहे”
बांधकाम कामगारांना निवृत्तीनंतर कोणतेही आर्थिक पाठबळ मिळत नाही,त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य अनिश्चित होते.ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी २०११ मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले होते. १८ ते ६० वर्षे वयोगटातील कामगारांची या मंडळात नोंदणी केली जाते आणि त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळतो.मात्र,६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही नोंदणी थांबत होती आणि कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नव्हता.ही अडचण दूर करत आता राज्य सरकारने आता नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याला १००० रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.
निकष..
“कामगारांना १० वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ५० टक्केच्या मर्यादेत प्रतिवर्षी ६ हजार,१५ वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर ७५ टक्के मर्यादीत प्रतिवर्षी ९ हजार आणि २० वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी १२ हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल”,
प्रतिक्रिया…
शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात.बांधकाम कामगारांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.या योजनेमुळे आता निवृत्तीनंतरही कामगारांना आर्थिक मदत मिळणार आहे.तसेच त्यांच्या कुटुंबांचे भवितव्य सुधारले जाईल.तालुक्यातील अधिकाधिक बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाकडे आपली नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून त्यांना शासनाच्या विविध ३२ योजनांचा लाभ घेता येईल.
सुहास कांदे – आमदार नांदगांव विधानसभा संघ,नांदगांव
अध्यक्ष,विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती