पिंपरखेडला कै.पुंडलिक पांडूरंग मवाळ विद्यालयात मराठी राजभाषा दिवस साजरा..
गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव:२८ कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त व मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त पिंपरखेड येथील कै.पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले.ग्रंथप्रदर्शन,प्रतिमा पूजन,फलकलेखन, स्वरचित कविता गायन व सादरीकरण तसेच व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ गवळी यांनी प्रमुख अतिथींचे शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मसाप शाखा नांदगावचे अध्यक्ष प्रा.सुरेश नारायणे यांच्या हस्ते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ गवळी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.विद्यालयाच्या ग्रंथालयातील दोनशेहून अधिक वाचनीय पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात आले होते.याचा लाभ पुढील दोन दिवस विद्यार्थ्यांना होणार आहे.यावेळी ग्रंथालयासाठी प्रमुख अतिथी प्रा सुरेश नारायणे त्यांची ग्रंथसंपदा भेट दिली.
कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील विविध कविता सादर केल्या. तसेच काही विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविताही सादर केल्या. त्या श्रोत्यांना खूप आवडल्या.यात प्रतिक्षा मवाळ,समृध्दी गरूड,धनश्री गरूड,प्रतिक सोमासे, आदेश घोटेकर आदींनी आपल्या स्वरचित रचना सादर केल्या.सर्व नवकवींना प्रा.सुरेश नारायणे यांनी फाऊंटनपेन बक्षीस स्वरूपात दिले व त्यांच्या कल्पनांना उभारी दिली.
प्रा. सुरेश नारायणे यांनी विविध दाखले देत आजच्या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले कुसुमाग्रज
तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या जीवनकार्याचा विद्यार्थ्यांना परिचय आपल्या भाषणातून करुन दिला.व मराठी भाषा टिकवण्यासाठी त्यांनी विविध उपाययोजना सांगितल्या इंग्रजी व हिंदी भाषेचा दैनंदिन व्यवहारात वापर टाळुन मराठी भाषा अधिक वापरा,तसेच मराठीतून सही करा, दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याचा आग्रह होता करा,मराठी दुरदर्शनचे टि.व्ही वरील कार्यक्रमांना प्राधान्य द्या.मराठी भाषिक शाळांमध्ये मुलांनी प्रवेश घेण्यासाठी आग्रही असावे, मराठी भाषेतील पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन करण्याचा संदेश त्यांनी दिला.तसेच भाषा वाढीसाठी त्यांनी मुलांना प्रतिज्ञा दिली.कार्यक्रमास संजय कांदळकर,श्रीमती अलका शिंदे,श्रीमती प्रिया देसले,आबासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते. सुंदर असे फलक लेखन विद्यालयाचे कला शिक्षक लक्ष्मण जाधव यांनी केले होते.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन, सुत्रसंचालन ते आभार हे सर्व इयत्ता नववीच्या उत्साही विद्यार्थी व विद्यार्थीनींनी केले.