दोन एकर कांदा पिकावर फिरवला रोटर
कांद्याचे भाव कोसळल्याने नैताळेच्या शेतकऱ्याने केला सरकारचा निषेध
गर्जा महाराष्ट्र24न्यूज
निफाड /नैताळे ता.२६ राज्यात कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा विक्रीतून उत्पादन खर्च,वाहतूक भाडे आणि ट्रॅक्टर भरण्यासाठी येणारा खर्च निघत नसल्याने निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकऱ्याने काढणीस आलेल्या दोन एकर कांदा पिकावर रोटर फिरवून कांदा मातीत मिसळून देत सरकारचा निषेध केला.
येथील सुनील रतन बोरगुडे या शेतकऱ्याने डिसेंबर २०२२ मध्ये दोन एकरवर लाल रांगडा कांद्याची लागवड केली होती.त्यासाठी त्यांनी सव्वा लाखाच्या आसपास खर्च केला होता.परंतु,आता काढणीस करून चांगल्या पद्धतीचा कांदा तयार आलेल्या कांद्यास ४०० चे ५०० रुपये क्विंटल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चासह मजुरी निघणे कठीण झाल्याने बोरगुडे यांनी दोन एकर कांदा पिकावर रोटर फिरवला.कांद्याचे सध्याचे कोसळलेले बाजारभाव व उत्पादन खर्च याचा कुठेच ताळमेळ बसत नाही.त्यात शासनाचे कायमच शेतकरीविरोधी धोरण याचा अक्षरशः विट आला आहे. पर्याय नाही म्हणून शेती व्यवसाय करावा लागत आहेत.मेहनत, भांडवल खर्च करुन तोटाच होत असल्याने दोन एकर कांद्यावर रोटर फिरविण्याचा निर्णय घेतला असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी सुनील बोरगुडे यांनी सांगितले.दरम्यान,एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्च करून जाहिरातबाजी करत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असे म्हणत आहे.मात्र,प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे शासनाने निर्यात त्वरित कायमस्वरूपी खुली करून निर्यातीसाठी आर्थिक प्रोत्साहन देऊन नियम व अटी शिथिल करत कांदा निर्यातीबाबत वर्षभराचे धोरण ठरवावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.