तेरी दो टकियो कि नोकरी में मेरा लाखों का….. मीच माझ्या आणि इतरांच्या जीवनाचा शिल्पकार …..

गर्जा महाराष्ट्र24 न्यूज वृत्तसेवा
बहती नदिया (संजीव धामणे)
दीड लाख रुपये पगाराचे प्राचार्यपद धुडकावतांना…. अनिश्चिततेच्या सागरात उडी मारण्यासाठी धैर्य आणि आत्मविश्वास असावा लागतो. तो असल्याने ज्ञानेश्वर बोगीर यशस्वी झाले.
नोकरी मिळाली नाही. म्हणून निराश होण्यापेक्षा दुसऱ्याला नोकरी देऊन आनंद मिळवू शकतो. हेच तत्व अमलात आणल. परिणामी गेल्या सात आठ वर्षात शेकडो युवकांना पोलीस, आर्मी व इतर शासकीय नोकरीत संधी मिळवून दिली. गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला लाथ मारून, इतरांच्या पाउल वाटेचे रुपांतर महामार्गात करणारे कृषीवल अकॅडेमीचे संचालक ज्ञानेश्वर बोगीर यांनी ‘मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे वचन सार्थ ठरवले.
लहानपणापासून बुद्धिमान असलेल्या बोगीर यांनी २००१ मध्ये करिअरची सुरवात वस्तीशाळेपासून केली. पुढे एम. ए., एम.एड, एम. लिब.& आयएससी, बी.एमसीजे, नेट,सेट करून पत्रकारिता, शिक्षक, प्राध्यापक अशा अनेक नोकऱ्या करतांना संस्था चालकांची अरेरावी तसेच बरेवाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. मुलाखतीत सरस ठरून सुध्दा केवळ ओळख आणि नोकरीसाठी आवश्यक असणारी आर्थिक गणिते त्यांना जमली नाहीत…..
२०१३ मध्ये व्याकरण शास्त्रावर पुस्तक लिहिले. दरम्यान शिक्षक म्हणून बोगीर सुपरिचित झाले होते. याच काळात टीईटी (टीचर्स एलीजीबिलीटी टेस्ट) साठी त्यांचे पाच विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात पास झाले.
स्वाध्यायी परिवाराच्या संस्कारात रुजलेल्या बोगीर यांनी स्पर्धा परीक्षेतला पहिला चक्रव्यूह भेदल्यामुळे, अल्पावधीत त्यांची ख्याती तालुक्यात व बाहेर पसरली. पोलीस भरतीच्या पहिल्या बॅच मध्ये सात विद्यार्थ्यांपैकी सहा मुल पास झाली. एरवी क्लासमध्ये प्रवेशा घेण्यासाठी आमिष दाखवले जाते. पण इथे गंगा उलटीच वाहायला लागली. चक्क… त्यावर्षी २५ युवक एकत्र आले आणि त्यांनी बोगीर सरांना गळ घातली. आमचा क्लास घ्या.
दरम्यान हिसवळ येथे सरांनी सुरु केलेल्या शिवाजी महाराज सार्वजनिक वाच्ननालयाच्या माध्यमातून चार मुले आर्मीत पोहोचली होती. कोणतीही जाहिरात न करता, माऊथ टू माऊथ प्रसिद्धी वर कृषीवलचा वेलू गगनावरी झेपावला.
स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे सर्व विषय उदा. गणित, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान शिकविण्यासाठी, चांगले शिक्षक मिळत नसल्याने स्वत:लाच ‘रिपेअर’ करून सक्षम केल. बोगीर यांच्या म्हणण्यानुसार नांदगाव शहरात उच्च कॅलिबर (गुणवत्ता)असलेल्या शिक्षकांची वानवा असल्याने त्यांनी स्वअध्ययन करून स्वत:ला रिपेअर केल.
त्यांच्याकडचे साडेतीनशे पेक्षा अधिक विद्यार्थी आर्मी नेव्ही, पोलीसात भरती झाले. शिक्षक व शैक्षणिक संस्थांनी आदर्श घ्यावा, असे कृषीवलचे यश आहे. २०१८-१९ या वर्षात एकदम ४६ जण आर्मीत गेले. त्यानंतर बोगीरांनी मागे वळून बघितले नाही. सध्या प्रत्येक रविवारी आयोजित कॅम्प मध्ये नि:शुल्क फिजिकल ट्रेनिंगसाठी येवला, मालेगाव येथून मुले नांदगावी येतात,
त्यांची आधीची स्टोरी विलक्षणच आहे. चालून आलेले प्राचार्यपद नाकारले. फक्त नोकरीत बंदिस्त करून घ्यायचे नाही. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ठेवायची. या प्रेरणेने पेटलेल्या ज्ञानेश्वर यांनी शिक्षण संस्थेतल्या प्राचार्य पदावर उदक सोडले. आणि हे नाकारून पुढे काय करणार!. असा प्रश्न करणाऱ्या संस्थेचे चालक आमदार यांना …. काहीही करेन… यापेक्षा अधिक काही तरी करून दाखवेन. असे प्रति आव्हान देत कमी वेळात आपले कर्तृत्व सिध्द केले.



