नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करा : राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांची मागणी
२ नोव्हेंबरपासून उपोषणाचा इशारा
गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा
नांदगाव, ता. २९ नांदगाव तालुक्यात दुष्काळाची स्थिती भयावह असून प्रशासनाने तही ही बाब दुर्लक्षित केलीच कशी ? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या ट्रिगर-२ मध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश झालेला नाही.यामुळे तालुक्यातील बळीराजा आणि सर्वसामान्य जनता आणि एकूणच सर्व बाजारपेठ हवालदिल झाली आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनास जाब विचारणे व तालुक्यातील जनतेला न्याय मिळावा यासाठी २ नोव्हेंबरपासून नवीन तहसील कार्यालयात लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी निवेदनातद्वारे दिली.
नांदगाव तालुक्यात दुष्काळाची स्थिती भयावह असून प्रशासनाने ते दुर्लक्षित केलेच कसे असा प्रश्न महेंद्र बोरसे यांनी निवेदनात उपस्थित केला आहे.’नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करणे,गावनिहाय नेमलेल्या ग्राम पीक पैसेवारी समितीतील सदस्यांची नावे जाहीर करणे,गावनिहाय पैसेवारी यादी जाहीर करणे,पैसेवारी समितीने घेतलेल्या पीक नमुना यादी गटनंबरसहित प्रसिद्ध करणे,भूजल पातळी सर्व्हेक्षण अहवाल प्रसिद्ध करणे,ट्रिगर- १ ट्रिगर- २ मधील पात्र / अपात्र गावांची यादी जाहीर करणे,पीक विमा दावे पात्र/ अपात्र अहवाल प्रसिद्ध करणे, पिण्याचे पाणी, चारा टंचाई वस्तुस्थितीदर्शक अहवाल प्रसिद्ध करणे,नाग्या साक्या धरणातून टँकरद्वारे होणारा दूषित पाणीपुरवठा बंद करून स्वच्छ व आरोग्यदायी पाणी पुरवठा नियोजन करणे,तालुक्यातील उपलब्ध जलसाठे व भविष्यातील पाणी व्यवस्थापन आराखडा जाहीर करणे,तालुका प्रशासनाने जिल्हाधिकारी / जिल्हा कृषी अधीक्षक यांना पाठवलेला अहवाल जाहीर करणे आदी प्रमुख मागण्यांकडे तालुक्याचे तहसीलदारांचे लक्ष वेधले आहे.तालुक्यातील खरीप हंगाम २०२३ हा अवर्षणामुळे वाया गेला असूनही तालुक्याचा समावेश ट्रिगर २ अंतर्गत घोषित करण्यात आलेल्या बेचाळीस तालुक्यात नांदगावचा समावेश का झाला नाही. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होण्याची शक्यता जवळपास मावळली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने केला आहे.