युवा नेते आदित्य ठाकरे यांचे बंडखोरांना आव्हान; नांदगावात कार्यकर्त्यांसोबत संवाद
एकदाच्या निवडणुका घेऊन दाखवाच :युवा नेते आदित्य ठाकरे
नांदगाव, ता.०९ :राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधीही होणार नसून त्यापूर्वीच राज्यातील सरकार गडगडणार आहे शिवसेनेतील आमदारांच्या कमी होणाऱ्या संख्येबाबत गद्दारांनी काळजी करू नये.त्यांच्या लेखी त्यांनी शून्य आकडा इतपत खाली आणला असला तरी एकदाच्या निवडणूका घेऊन टाका त्यात शिवसेनेच्या निष्ठावान आमदारांचा आकडा १०० वर गेलेला असेल असा हल्लाबोल करीत शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नांदगाव येथे शिवसंवाद कार्यक्रमात बंडखोर मंडळींवर निशाणा साधत त्यांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सातव्या टप्प्यात असून यात यात्रा नाशिकहून मराठवाडा विभागाकडे जाताना नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवरील नांदगाव विधानसभा मतदार संघातील शेतकरी यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकां सोबत जैन धर्मशाळेत संवाद साधला.या यात्रेत ते मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर ते काय बोलणार? विषयी मोठी उत्सुकता होती. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मात्र आमदार कांदे यांच्यावर टीका केली.मात्र स्वतः आदित्य ठाकरे यांनी मात्र त्यांच्यावर बोलणे टाळत राज्यातील बंडखोरांव सरसकट ४० दगाबाज अशा शब्दात आसूड ओढले.श्री.ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्याच्या सध्याच्या खालावत चाललेल्या स्थितीचा समाचार घेताना आज समाजातील कुठल्याही घटकाला हे सरकार आपले आहे असे वाटत नाही.कायदा सुव्यवस्था,बेरोजगार,शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीचे भवितव्य बोलण्यावर भर दिला.येणारा काळ हा सुवर्णकाळ असल्याचे सांगताना आदित्य ठाकरे यांनी राज्यात यापूर्वी व सध्या काढलेल्या शिवसंवाद यात्रेच्या विविध टप्प्यातून राज्यभरातून जनतेचा सकारात्मक असा मिळालेल्या प्रतिसादातून दिसून आल्याचा दावाहीकेला.सध्या दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जातोय असाच काहीसा प्रकार येथील मतदार संघातील करंजवण योजनेबाबत देखील होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी करताना ही योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मार्गी लागल्याचा दावा देखील त्यांनी केला.स्वतःसाठी दिल्लीला जाणाऱ्यांनी राज्यासाठी दिल्लीहून काय आणले असा सवाल केला.जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांनी मालेगाव बाह्य व नांदगाव विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा केला.तर माजी आमदार राजाभाऊ देशमुखयांनी नांदगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवारी गणेश धात्रक यांना जाहीर करावी अशी मागणी करून खळबळ उडवून दिली.व्यासपीठावर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,आमदार नरेंद्र दराडे,जयंत दिंडे,माजी आमदार अॅड जगन्नाथ धात्रक,माजी आमदार राजाभाऊ
देशमुख,संपर्कप्रमुख अल्ताफ खान,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक,कुणाल दराडे, अद्वय हिरे,शशिकांत मोरे, संतोष बळीद, प्रवीण नाईक,श्रावण आढाव,माधव शेलार आदी उपस्थित होते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनी प्रास्ताविक केले संतोष जगताप यांनी सूत्रसंचालन केले.



