कांद्याचे भाव घसरल्याने नांदगावला शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कामकाज पूर्ववत
गर्जा महाराष्ट्र २४ न्यूजवृतसेवा
नांदगाव १५ :येथील बाजार कांद्याचे भाव घसरल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव रोखत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर येवला रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
कांद्याच्या भावात क्विटंलला ८०० रुपयांची झालेली घसरण पाहून शेतकऱ्यांनी आपल्या संतापाला वाट करून दिली.एकीकडे दुष्काळाचे चटके सहन करायचे अन् दुसरीकडे कष्टाने पिकविलेल्या कांद्याचे भाव कमी करायचे,यासारखा दुसरा अन्याय नाही,असा आरोप शेतकऱ्यांनी केला.सकाळी लिलावाला सुरवात होताच,कांद्याचा क्विटंलचा भाव ८०० रुपये निघताच,जळगाव बुद्रकचे नवनाथ कांदे यांच्यासह लिलावासाठी उपस्थित असलेले शेतकरी संतप्त झाले.नवनाथ कांदे यांच्या नेतृत्वाखाली लिलाव बंद पाडण्यात आले. बाजार समितीत,खरेदीदार व्यापाऱ्यांचे संगनमत असल्याने भावात घसरण झाल्याचा आरोप नवनाथ कांदे यांनी केला.
बाजार समितीच्या प्रवेशद्वारापुढे रास्ता रोको आंदोलन सुरू झाल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.आंदोलनाची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी तात्काळ आंदोलनस्थळी पोचले.त्यांनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांची समजूत काढली.पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार,बाबासाहेब साठे यांना बोलावून घेतले श्री अमोल खैरनार यांच्या दालनात चर्चा झाल्यावर लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले.
■■■■■■
एक हजार ८५० रुपये भाव
नांदगांव बाजार समितीत तीन हजार २०० क्विंटल कांद्याची आवक झाली होती.त्यास किमान ४०० ते कमाल दोन हजार १०० आणि सरासरी एक हजार ८५० रुपये क्विंटल असा भाव मिळाला